'सुशांतसिंह प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा अजिबात संबंध
- 151040748 - BHAGWATI DILIP SHUKLA
0
भगवती शुक्ला, प्रदेश ब्यूरो चीफ महाराष्ट्र :मुंबई: 'सुशांतसिंह आत्महत्या किंवा त्या प्रकरणाच्या चौकशीशी आदित्य ठाकरे यांचा दुरान्वयेही संबंध नाही. कुणाकडे तसे पुरावे असतील तर त्यांनी बेधडक मीडियाच्या समोर पुरावे आणावेत आणि आरोप सिद्ध करून दाखवावेत,' असं आव्हान परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिलं.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत मुंबईतील युवा मंत्री हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्या दबावामुळं मुंबई पोलीस मोकळेपणाने चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपनं केला आहे. भाजपचा रोख पर्यावरण मंत्री व मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर आहे. बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबई पोलिसांच्या चौकशीबाबत नाराजी व्यक्त करताना आदित्य ठाकरे आणि करण जोहर यांच्या मैत्रीचा हवालाही दिला आहे. त्यामुळं या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे. राज्य सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास ठाम नकार दिल्यानं चर्चेत भर पडली आहे.
प्रत्येक जण यावर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय. एखाद्यानं मागणी केली म्हणून लगेच कुठलाही तपास सीबीआयकडे देता येत नाही. त्यासाठी ठोस कारणं असावी लागतात आणि ती संबंधितांना द्यावी लागतात. मुंबई पोलिसांनी या सगळ्याचा खुलासा आधीच केलेला आहे,' असं परब म्हणाले. 'गेल्या पाच वर्षात किती आत्महत्या झाल्या? किती हत्याकांडं झाली? त्यापैकी किती प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिली? याच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे का, असा प्रश्नही परब यांनी केला.
'नितीश कुमार यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. ते महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख नाहीत. ते बिहारच्या पोलिसांचे प्रमुख आहेत. त्यांच्या राज्यात काय चाललंय, त्यावर त्यांनी भाष्य करावं. बिहारच्या राजकारणासाठी हे सगळं सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारची भूमिका ठाम आहे. सरकार मुंबई पोलिसांच्या पाठीशी उभे आहे आणि शेवटपर्यंत राहणार,' असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्यावरील सर्व आरोप त्यांनी खोडून काढले. 'राजकारणात प्रतिमा खराब करण्यासाठी आरोप करण्याचं तंत्र जुनं आहे. आताही तेच वापरलं जातंय. शिवसेनेच्या युवा नेत्याची, मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीचं हे षडयंत्र आहे. हे अनेकांना भोगावं लागलंय. मोदींवर गोध्रा हत्याकांडाचा ठपका होता. त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. अमित शहा यांचं नाव सोहराबुद्दीन प्रकरणात वारंवार घेतलं गेलं. न्यायमूर्ती लोयांच्या प्रकरणातही अनेकांवर आरोप झाले. पण कालांतराने हे आरोप सिद्ध झाले नाहीत,' हेही त्यांनी निदर्शनास आणलं. 'आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही अशाच पद्धतीनं कारस्थान सुरू आहे. राजकीय कारकीर्द खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचा विरोधी पक्ष हे सगळं करतोय. काही लोक व्हॉट्सअप वर मेसेज फिरवताहेत, ते कोणाशी संबंधित आहेत ते तपासायला हवं,' असा थेट आरोप परब यांनी केला.151040748